Pune
राज्यभरात वीज बिलात (Smart Meter) अचानक वाढ झाल्याची तक्रार हजारो ग्राहकांकडून सातत्यानं करत आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनाही या स्मार्ट मीटरचा शॉक बसला आहे.
यापूर्वी त्यांच्या घराचे मासिक वीज बील 5 हजार रुपयांच्या दरम्यान येत होते, मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ते आता 20 हजार रुपयांवर आले आहे.
गुलाबरांनी आपल्या घराचे मासिक वीज बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल २० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे सोमवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या घरातील वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पाटील म्हणाले, एक विनंती आहे की, तुमचे स्मार्ट मीटर आमच्यावर लयी प्रेम करतंय ते सांभाळा. केवळ माझ्या निवासस्थानीच नाही तर तर मतदारसंघातील अनेक ग्राहकांचेही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. लोक माझ्या घरी तक्रारी घेऊन येत आहेत. स्मार्ट मीटर बसवताना ते स्वच्छेने बसवा असा सल्ला गुलाबरावांनी दिला.
पूर्वी केले होते स्मार्ट मीटरचे समर्थन
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, केवळ त्यांच्या निवासस्थानाचेच नव्हे, तर मतदारसंघातील अनेक ग्राहकांचेही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होईल, दिवसा वीज वापरासाठी सवलती मिळतील आणि ग्राहकांचे वीज बिल कमी होईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्तपणे स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहनही त्यांनी केले होते.