Pune
सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहे. बड्या आयटी कंपन्यांकडून नवीन मनुष्यबळ भरती दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सध्या आयटीत नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे.
मात्र आता एका आयटी अभियंत्याने वार्षिक ७२ लाख रुपये पगाराच्या नोकरीवर लाथ मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या पोस्टवरून मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला कंपन्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. कंपन्यांकडून अद्याप कामाच्या संमिश्र पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यात आठवड्यातील काही दिवस कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देऊनही त्यांची उत्पादकता कायम राहत असल्याचे करोना संकटाच्या काळात समोर आले होते. मात्र तरीही कंपन्यांकडून यास आता टाळाटाळ केली जात आहे.
पोस्टमध्ये नेमके काय?
या पार्श्वभूमीवर 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका आयटी अभियंता तरुणीने केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या एका अभियंता मित्राने वार्षिक तब्बल ७२ लाख रुपये पगाराची नोकरी नाकारली. कारण या नोकरीतील अटी त्याच्यासाठी जाचक होत्या. त्यात सर्वप्रथम आठवड्यातील पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक होते. तसेच रजेचे कोणतेही निश्चित धोरण नाही आणि इतर ठिकाणी काम केल्यास रिलोकेशन बोनस नाही, या गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे त्याने नोकरीस स्पष्टपणे नकार दिला. एवढे करूनही त्याला कोणताही पश्चाताप झालेला नाही. अशा प्रकारची आपल्या भूमिकेवर ठाम राहणारी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, खूप चकित करणारे आहे. आजच्या तरुण पिढीचा प्राधान्यक्रम बदलला असून त्यात पैसा हेच सर्वस्व नाही.