Pune mumbai
सरकारनं 36 हजार कोटींची कर्जमाफी योजना मंजूर केली असून राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचा दावा सरकारनं केलाय. मात्र प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचंच संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय.
कारण 2019 मध्ये मविआ सरकारनं थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही. आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे.
या शेतकऱ्यांचं कर्ज जरी दोन लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50 हजारांचाच लाभ मिळणार असून त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. तर दोन लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे विरोधकांनी या अटींना जोरदार विरोध केला असून सरसकट कर्जमाफीची मागणी केलीय. सरकारनं जीआरमध्ये नेमक्या कोणत्या अटी घातल्या आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार ते पाहूयात
कुणाला मिळणार किती कर्जमाफी?
यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज माफ होणार
2019ला कर्जमाफी मिळालेल्यांचं केवळ 50 हजारांचं कर्ज माफ होणार, उर्वरित रक्कम भरावी लागणार
2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी नाही
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान मिळणार
एवढ्या अटी आणि शर्ती लादल्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर विरोधकही या अटींवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आपल्या अटींवर ठाम राहणार की यात बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.