आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची नवीन पॉलिसी; जीआर आला

शरद लाटे  97   16-04-2026 14:02:03

Pune 

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकपणा आणि पदांचा समतोल राखण्यासाठी हे नवीन सर्वसमावेशक बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व संस्था व कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकरीता सर्वसमावेशक बदल्यांचे धोरण, कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. बदली वर्ष म्हणजे ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष, असे गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्याची बदलीसाठी गृहित धरावयाची सेवा ही बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली सलग वास्तव्य सेवा असेल.

कार्यालयातील टक्केवारीनुसार बदल्या होणार

  • कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील एकूण कर्मचाऱ्यांच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही.

  • प्रत्येक कॅलेंडर वर्षात विनंती बदल्यांचे आदेश माहे सप्टेंबर व माहे डिसेंबर महिन्यात निर्गमित होतील.

  • बदलीसाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहील.

बदल्यांचा प्राधान्यक्रम कसा असेल?

१. पक्षाघाताने आजारी कर्मचारी/कुटुंबातील सदस्य

२. अपंग कर्मचारी / मतिमंद मुलांचे पालक

३. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी/कुटुंबातील सदस्य

४. मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी

५. कॅन्सरने आजारी कर्मचारी किंवा कुटुंबातील सदस्य

६. आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

७. विधवा, कुमारीका, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला कर्मचारी

८. वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी (विनंती केल्यास)

९. पती-पत्नी एकत्रीकरण.

१०. दहवी-बारावीमध्ये पाल्य शिक्षण घेत असलेले कर्मचारी

बदल्यांचे अंतिम अधिकार कोणाला?

गट ब कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे बदली प्राधिकरण हे सचिव-२ (आरोग्य मंत्र्यांच्या मान्यतेने) असतील. गट ड कर्मचाऱ्यांचे बदली प्राधिकरण संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे, गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्या परिमंडळांतर्गत होतील. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे उपसचिव चंद्रकांत विभूते यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.