Pune
महाराष्ट्रात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या उष्णतेपासून नागरिकांचे आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नवीन 'मानक संचालन प्रक्रिया' (SOP) लागू करण्याची घोषणा केली. या नवीन नियमांनुसार, उष्णतेची लाट असताना दुपारी कामाच्या वेळेवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
कामाच्या वेळेत मोठा बदल
वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आणि आजारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारने 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट दरम्यान दुपारी 12 ते 4 या वेळेत सर्व प्रकारची बाहेरील कामे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कामगारांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सकाळची कामाची वेळ 6 ते 11 वाजेपर्यंत असेल आणि संध्याकाळची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. स्थानिक प्रशासनाला बांधकाम क्षेत्र, औद्योगिक वसाहती आणि फेरीवाल्यांच्या क्षेत्रात या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
15 जिल्हे 'हाय-रिस्क' झोनमध्ये
हवामानातील बदलांमुळे राज्याच्या काही भागांत पारा 47 ते 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांना अति-संवेदनशील जाहीर केले आहे. यात लातूर, अमरावती, यवतमाल, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपुर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्हांचा समावेश आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये सिमेंटच्या जंगलामुळे 'अर्बन हीट आयलंड' प्रभाव जाणवत असून तापमान अधिकच वाढत आहे. यामुळेल आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने केवळ कामावर बंदी घातली नसून इतर सुविधा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.
या सुविधा पुरवण्याचे निर्देश
- वॉटर बूथ: बाजारपेठा, चौक आणि ट्रॅफिक जंक्शनवर पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
- औषध पुरवठा: प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ओआरएस (ORS) आणि इलेक्ट्रोलाइट्सचे मोफत वाटप करणे.
- आपत्कालीन सेवा: संवेदनशील भागांत 108 रुग्णवाहिका तैनात ठेवणे आणि आशा स्वयंसेविकांना 'हीट स्ट्रोक' ओळखण्याचे प्रशिक्षण देणे.
- तात्पुरती सोय: कामगारांसाठी सावलीची व्यवस्था करणे आणि दुपारी बागा व उद्याने खुली ठेवणे.
उन्हात बाहेर पडू नका
राज्यातील 50 टक्कांपेक्षा जास्त जिल्हे उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या श्रेणीत येतात. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश यांचा उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या प्रदेशात समावेश आहे. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये वाढणाऱ्या काँक्रीटीकरणामुळे तापमाना वाढत आहे. तर कोकणसारख्या किनारपट्टीच्या भागातील उच्च आर्द्रतेमुळे उष्णतेच्या लाटेचा धोका आणखी वाढतो. राज्यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त जिल्हे सध्या उष्णतेच्या लाटेच्या धोक्यात असल्याने नागरिकांनीही गरज असल्याशिवाय उन्हात बाहेर पडू नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.