Pune
आदिनाथ महाराज शास्त्रींनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी भगवान बाबांसारखा आपल्या शरीराला छेद घेण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचे आहे. वारकरी संप्रदायाला हे मान्य नाही. ज्ञानेश्वरीने मोठे व्हा; शरीर कापून मोठे होऊ नका', अशा शब्दांत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आदिनाथ महाराजांवर टीका केली आहे.
शिंगोरी येथे सुरु असलेल्या ४८ व्या नारळी सप्ताह सोहळ्यात कीर्तनात बोलताना त्यांनी ही टीका केली. पाथर्डी-बीड हद्दीवरील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दोन आठवड्यांपूर्वी आपल्या अवयवाला छेद करुन घेतला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. याचा संदर्भ देऊन नामदेव शास्त्री यांनी ही टीका केली.
नामदेव शास्त्री म्हणाले, 'आदिनाथ महाराजांनी भगवान बाबांसारखा शरीराला छेद करुन घेतला. ते चूक आहे. माणसाने ज्ञानी असावे. स्वतःवर आघात करुन घेऊ नये. भगवानबाबांची परिस्थिती वेगळी होती. भगवानबाबांनी २०-२२ वर्षाच्या काळात आपल्या शरीराला छेद घेतला होता. तुम्ही साठी गाठत आला आहात. साठीला हे करणे चुकीचे.'
सहानुभूतीसाठी करणे हे पाप
'उद्या कोणतेही येणारे साधक आपल्या शरीराचे अंग कापतील व संत होतील. ही चुकीची परंपरा तुम्ही सुरु केली. मी हे सौजन्याने बोलतो आहे. समाजाची सहानुभूती तुम्हाला मिळत आहे. पण समाजाची सहानुभूती घेणे हे पाप आहे', अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी सुनावले.
'संताचे प्रेम मिळाले पाहिजे. सहानुभूती नव्हे. तुमच्यावर काहीही आरोप नसताना हे कुटाणे कशाला केले? त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो नाही. असा आदर्श लोकांसमोर ठेवू नका. नाहीतर पुढचा महंत तसाच बसवावा लागेल', असे नामदेव शास्त्री म्हणाले.
माझे बोलणे वाईट वाटेल, पण सत्य सांगितले पाहिजे
नामदेव शास्त्री म्हणाले, 'सहानुभूती कोठे आहे जेथे सत्य आहे. आपल्या शरीराला सांभाळा. ती तारकेश्वराची गादी आहे. तारकेश्वर मालक आहेत. आपण वॉचमन आहोत. त्यांच्या नावाने आपण जगतो. सेवा करायला आपणास मिळाली हे भाग्य. वॉचमन या नात्याने नारायण महाराज यांची सेवा करा. संत होण्याचा प्रयत्न करु नका.'
'ज्ञानाने संत ओळखला जातो. ज्ञानेश्वरीने मोठे व्हा. शरीर कापून मोठे होऊ नका. माझे बोलणे वाईट वाटणार आहे. पण सत्य सांगितले पाहिजे. चुकीचा आदर्श समाजासमोर मांडायला नको. या वयात आपण शरीर कापू नये एवढे समजू नये. समाजाने तुम्हाला गादीवर बसविले. एवढे सगळे मिळाल्यानंतर साधक म्हणून जीवन जगा', असे नामदेव शास्त्री म्हणाले.
मी वाघाचा बछडा : आदिनाथ शास्त्री
शिंगोरी येथील नारळी सप्ताहात गुरुवारी आदिनाथ शास्त्री यांचे कीर्तन झाले. मात्र, त्यांनी नामदेवशास्त्री यांनी केलेल्या टीकेवर थेट भाष्य केले नाही.
ते म्हणाले, 'नारायण महाराज सांप्रदायातील वाघ आहेत. मोठे म्हणून त्यांची ओळख. ते संप्रदायातील वाघ म्हणून ओळखले जातात. मी त्यांचा बछडा आहे. मी कुणालाच भित नाही. नारायण महाराजांचा हात माझ्या डोक्यावर आहे.'
'काळाचीही मला भीती वाटत नाही. मला कुणी भित नाही म्हणून मीही कुणाला भित नाही. हा तारकेश्वर गडाचा सप्ताह आहे. मला शिंगोरीकरांनी सप्ताहाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण मी सर्वांना सामावून घेऊन जाणारा आहे. २०११ साली नारायण महाराज समाधीस्थ झाले. ते असताना उताऱ्यावर माझे नाव लावले', असे उत्तर आदिनाथ शास्त्रींनी दिले.
'भगवानबाबांना माणिकबाबांनी जवळ घेतले. तसा नारायण महाराजांनी माझा अंगीकार केला. मला हे बोलणे आवडत नाही. पण प्रश्न केला तर त्याचे उत्तर द्यावे लागते. लोकांना पाया पडण्यासाठी माझे पाय पवित्र हवेत. लोकांची माझ्यावर अफाट श्रद्धा आहे. मठाधिपती होणे सोपे नाही. मी भोळा आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आदिनाथ शास्त्री यांची भूमिका समजावून घेण्यासाठी 'लोकमत'ने त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.