आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शरद पवारांनी अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी काय घडलं? तो 'मास्टर प्लॅन' समोर

नितीन देशपांडे   54   07-03-2026 12:45:47

Pune महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट मिटवून दोन्ही गट पुन्हा एकत्र आणण्यासाठी राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या अवघ्या सात दिवसांपूर्वी एक निर्णायक प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्या आणि पार्थ पवारांचे पुनर्वसन करा, असा प्रस्ताव शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने अजित पवार गटासमोर ठेवला होता. मात्र, या प्रस्तावावर दुसऱ्या बाजूने कोणतेही उत्तर न आल्याने अखेर विलीनीकरणाची ही शेवटची संधीही हुकली असल्याचा मोठा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठ्या नेत्याने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू होत्या. शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने हा प्रस्ताव मांडला होता की, शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सहा वर्षांसाठी राज्यसभेवर पाठवावे आणि त्या बदल्यात सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे. या प्रस्तावामागे असा तर्क होता की, जर शरद पवार मविआकडून निवडून गेले, तर विलीनीकरणाचे सर्व कायदेशीर आणि राजकीय मार्ग कायमचे बंद होतील. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, असा संदेश अजित पवार गटाला देण्यात आला होता.

अजित पवार गटाचे मौन

हा प्रस्ताव अत्यंत गोपनीय पद्धतीने दोन्ही गटांमधील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. मात्र, अजित पवार गटाकडून या प्रस्तावावर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही किंवा कोणतेही उत्तर आले नाही. विलीनीकरणाचा हा शेवटचा धागाही तुटल्याचे लक्षात येताच, अखेर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, आता ही निवडणूक बिनविरोध होत असल्याने पवारांच्या राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची आशा मात्र धुळीस मिळाली आहे.

आगामी निवडणुकीवर परिणाम

या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना संयुक्त उमेदवार बनवून दोन्ही पक्ष एकत्र येण्याची ही शेवटची खेळी होती, जी यशस्वी होऊ शकली नाही.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.