Pune Update
कष्ट, संघर्ष आणि जिद्दीची खरी कहाणी अनेकदा एखाद्या साध्या घरातून उभी राहते. गरीबीशी दोन हात करत, आई-वडिलांच्या घामाच्या थेंबांतून उभे राहिलेले एक स्वप्न साकार झाले आहे
देशात ५६१ वा क्रमांक मिळवत बापूसाहेब गायकवाड यांनी IPS पदापर्यंत मजल मारली आणि एका गरीब कुटुंबाच्या आयुष्यात अभिमानाचा सुवर्णक्षण आणला. एकीकडे आई दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी करत होती, तर वडील बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करत होते. स्वतःच्या पोटाला चिमटा काढत त्यांनी मुलाला शिक्षण दिलं आणि आज त्या कष्टाचं सोनं झालं आहे.
अहिल्यानागर येथील छोट्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला बापूसाहेब गायकवाड घराला हातभार लावण्यासाठी जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचं काम करत होता, पण डोळ्यांत मात्र मोठं स्वप्न होतं. डिप्लोमा पूर्ण करून त्याला L&T सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, मात्र मनात एकच ध्यास होता UPSC चा. त्यासाठी त्याने नोकरीही सोडली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेत UPSC च्या तयारीला सुरुवात केली.
बापूसाहेब गायकवाड यांचा आयपीएस मित्राने सांगितलं, हा प्रवास सोपा नव्हता. अपयश, अडथळे, निराशा सगळं काही त्याच्या वाट्याला आलं. एकीकडे CRPF मध्ये Assistant Commandant सारखी प्रतिष्ठेची नोकरी मिळूनही त्याने ती नाकारली. कारण त्याचं लक्ष्य अजून उंच होतं. आता अखेर अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर UPSC परीक्षेत देशात ५६१ वा क्रमांक मिळवत तो IPS अधिकारी झाला.
ज्या मुलाचे वडील वॉचमन होते. ज्या आईने इतरांच्या घरात भांडी घासून मुलाला घडवलं. त्याच मुलाने आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करत अभिमानाने उंच शिखर गाठलं आहे. मावळातील देहूरोडच्या आर्मी केंद्रीय विद्यालय येथे अनिरुद्ध गायकवाड यांच्या निवासस्थानी बापूसाहेब गायकवाड यांचा फेटा बांधून आणि हार घालून सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
बापूसाहेब गायकवाड यांचा प्रवास आज हजारो तरुणांना एकच संदेश देतो 'गरीबी' अडथळा नसते… परिस्थिती अडथळा नसते…जिद्द आणि मेहनत असेल, तर स्वप्न नक्कीच साकार होतात." फक्त जिद्द आणि चिकाटी असेल तर आई वडिलांच्या मेहनतीच्या जीवावर उंच शिखर गाठण्यास वेळ लागत नाही. हेच बापूसाहेब गायकवाड यांनी दाखवून दिले आहे.