Pune राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी 55 टक्के असलेला महागाई भत्ता आता 58 टक्के झाला आहे.
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत याबाबत विधायक निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाई वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात थोडे जास्त पैसे येणार आहेत.
एकदम मोठी रक्कम हातात येणार
ही महागाई भत्त्याची वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांची थकबाकी मार्च 2026 मध्ये एकदम अदा केली जाईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीची थकबाकी मात्र स्वतंत्र सरकारी आदेश काढून नंतर दिली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना एकदम मोठी रक्कम हातात येणार असून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील.
निर्णयाचा फायदा कोणाला?
या निर्णयाचा फायदा सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी आणि 8.12 लाख निवृत्त कर्मचारी-निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
50 हजार रुपये पगार असल्यास?
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार 50 हजार रुपये असेल तर पूर्वी महागाई भत्ता 27 हजार 500 रुपये (55%) मिळत होता. आता तो 29 हजार रुपये (58%) होईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जादा पगार मिळेल. एकूण पगारात ही 1500 रुपयांची वाढ होईल आणि वर्षभरात 18 हजार रुपये जादा मिळतील. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी हा निर्णय खूप उपयुक्त ठरलाय. महागाईमुळे रोजच्या खर्चात वाढ झाली होती. आता महागाई भत्त्यात वाढ झाल्याने किराणा, शिक्षण, आरोग्य अशा गरजा भागवणे सोपे होणार आहे.
आशिष जयस्वाल काय म्हणाले?
"राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे. आर्थिक सुरक्षितता राखताना कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते.", असे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. यामुळे कर्मचारी अधिक उत्साहाने काम करतील आणि राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास सरकारला आहे.
माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी तरतूद
माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी 44.88 कोटीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये AI चा देखील समावेश आहे. AI (कृत्रिम बुद्धीमत्ता) Coach - माहिती तंत्रज्ञान खात्यामार्फत भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित प्रणालीच्या दिशेने एक पाऊल म्हणून AI Coach उपक्रम सुरु करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवांच्या ऑनलाईन अर्जासंबंधी नागरिकांना सुलभता प्रदान करण्याकरिता BMC Citizen AI Coach हा डिजिटल वॉकथूद्वारे मार्गदर्शन करेल. तसेच, BMC Employee AI Coach विकसित करण्यात येणार असून त्याद्वारे कामाच्या स्वरुपानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वापरात असलेल्या विविध माहिती तंत्रज्ञानावर आधारीत प्रणालींचे स्वतः शिक्षण घेण्याकरिता व प्रणालींबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यास मदत म्हणून कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षमता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने डिजिटल वॉकथ्रूद्वारे मार्गदर्शन करेल.