पिंपरी (pune news):- जे सोडून गेलेत, त्यांची चिंता करू नका.. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत. १९७८ साली अनेक आमदार मला सोडून गेले. मी त्यावेळी चिंता केली नाही.. पुन्हा मी पक्ष उभा केला. त्यामुळे कोणी सोडून गेले याची चिंता करू नका. जनता सुज्ञ आहे, लोकशाही त्यांच्यामुळेच जिवंत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच सत्तेसाठी भाजपसोबत जाणार नाही, संधीसाधू राजकारण करणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा संपन्न झाला यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, राहुल कलाटे, सुलक्षणा शीलवंत, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, रविकांत वर्पे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बरेच दिवसातून तुमच्यासोबत सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे या उद्योगनगरीची निर्मिती झाली. भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या. संपूर्ण राज्यातून लोक रोजगारासाठी आले. कष्टकऱ्यांच्या घामातून हे शहर उभे राहिले आहे. आज शहरात २४ तास पाणी ही लोकांची मागणी आहे. अनधिकृत बांधकाम कायम करणे हा प्रश्न मोठा आहे. शहरातील रेड झोनचा प्रश्न देखील गंभीर आहे, त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्या पूर्णपणे फेसाळलेल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारांनी काम करणारे संघटन याची आता अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकतो.
महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीत नवीन नेतृत्वाची फळी तयार करणे आवश्यक आहे. विकासाच्या कामाला गती द्यायची आहे. या नगरीचा लौकिक कायम ठेवायचा आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी या भागात आपल्याला करायची आहे. इथलं चित्र बदलायचे असेल तर संघटन मजबूत असायला हवे. काही लोक पक्ष सोडून गेले पण नवीन लोक देखील येत आहेत. जे गेले त्यांची चिंता करू नका. लोकं शहाणे आहेत. लोकशाही आज टिकली आहे ती सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणामुळेच.
सगळ्यांना बरोबर घ्यायचा असा सूर आहे, त्यात काही गैर नाही. पण कोणाला बरोबर घ्यायचे हा प्रश्न आहे. गांधी, नेहरू हा काँग्रेसचा विचार आहे. त्या विचाराच्या लोकांना आपण बरोबर घेऊ, पण भाजपचा तो विचार नाही. त्यामुळे सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसण्याचा प्रश्नच नाही. संधिसाधू विचाराचे राजकारण करणार नाही. तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथे आपण सगळ्या जागा लढवू. पिंपरी चिंचवडच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या विचाराने कोणी सोबत येत असतील तर नक्कीच विचार होईल. प्रत्येक वार्डात नवीन नेतृत्व आपल्याला तयार करायचा आहे. उद्याच्या महापालिका निवडणूकीची तुम्ही चिंताच करू नका. आपण सगळ्याच जागांवर उमेदवार उभे करू, यात भगिनींना जास्तीत जास्त संधी देऊ. आणि पुन्हा एकदा आपल्या विचाराने काम करणाऱ्या लोकांच्या हातात हे शहर देऊ असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
शेवटी बोलताना ते म्हणाले की, नदीच्या पलीकडे एक आणि नदीच्या अलीकडे एक, या रस्त्याच्या पलीकडे एक आणि रस्त्याच्या अलीकडे एक अशा वाटण्या या शहरात झालेल्या आहेत. राजकारणाचा यांनी नवीन व्यवसाय केला आहे. इथलं चित्र पूर्णपणे आता बदलून टाकायचं आहे. मी तुम्हाला विश्वास देतो शहरात आता अधिकचे लक्ष घालणार आहे. सर्वांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पक्ष पुन्हा एकदा बांधू शकतो, असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.