पुणे (Pcmctahalka.in) बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी ते गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मात्र अद्यापही सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. जर आज सरकारकडून निर्णय घेण्यात आला नाही, तर उपोषणासह जलत्यागाचाही इशाराही त्यांनी दिला आहे.
कर्जमाफीवरून बच्चू कडू म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय खूप आधी व्हायला हवा होता. सरकार आता या विषयावर बोलतंय खरे, पण अजूनही कर्जमाफीचा अहवाल कधी येणार आणि निर्णय नेमका केव्हा होणार, याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही," अशी तीव्र प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. "फक्त बोलून चालणार नाही. निर्णयाची तारीख तरी सांगा," असा सवालही त्यांनी सरकारला केला
पोलिसांचा चोख बंदोबस्त ठिकठिकाणी लावला आहे. मात्र आमचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत. रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे," असं सांगत बच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणताही आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे. "आज निर्णय झाला नाही, तर १६ तारखेला जलत्याग करणार," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला.दरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात भाषणेवेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अमरावतीच्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालून ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांचा जाब विचारताच शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या,अशी मागणी करत घोषणाबाजी केली.